MSRTC Smart Card – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी “राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड” (NCMC) स्मार्ट कार्ड सेवा सुरू केली असून, पिंपरी येथील वल्लभनगर आगारात गेल्या दहा दिवसांपासून या कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. दररोज 120 हून अधिक प्रवासी नोंदणी करत असून कार्ड काढण्यासाठी गर्दी होत आहे. ही सेवा ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्या सहयोगाने राबविण्यात येत असून सर्व सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांना “व्यक्तिगत कार्ड” स्वरूपात वितरित केले जाणार आहे. या कार्डवर संबंधित व्यक्तीचे नाव व फोटो असणार असून ते अहस्तांतरणीय असणार आहे. NCMC कार्ड म्हणजे काय? राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड हे एकच डिजिटल कार्ड असून प्रवास पास, ओळखपत्र व रोख व्यवहार या सर्व गोष्टी एकाच माध्यमातून करता येणार आहेत. यामुळे सुट्ट्या पैशांची गरज भासणार नाही, तसेच वेगवेगळी कागदपत्रे सांभाळण्याचा त्रासही कमी होणार आहे. सवलतधारकांसाठी कार्ड अनिवार्य विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य महिला, दिव्यांग, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विविध व्याधीग्रस्त रुग्ण, अधिस्वीकृत पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आदी सवलतपात्र प्रवाशांना हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. रा.प. प्रवासासाठी सवलतीचे तिकीट काढताना हे कार्ड अनिवार्य राहणार आहे. 199 रुपयांत नोंदणी; नोंदणीसाठी संबंधित व्यक्ती स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून आधार कार्ड व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. 199 रुपयांमध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत असून पुढील एका महिन्यात आपल्या पत्त्यावर कार्ड मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. कार्ड कसे वापरायचे? कार्डमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन प्रकारचे वॉलेट असणार असून वॉलेटचे रीचार्ज किमान ५० रुपये किंवा ५० रुपयांच्या पटीत करता येईल. प्रथमच रिचार्ज करताना किमान १०० रुपये भरणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या स्मार्ट कार्डमध्ये शिल्लक रक्कम असलेल्या लाभार्थ्यांची रक्कम नवीन कार्डमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. एसटी बस विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रक्रिया शालेय विद्यार्थ्यांना पाससाठी अर्ज ५ रुपयांत उपलब्ध करून दिला जात आहे. हा अर्ज स्थानिक बस स्थानकातून घेऊन, शाळेतील मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा फोटो, पालकांचा व विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे. त्यानंतर आगारातील पास वितरण कक्षात मशीनद्वारे नोंदणी करून. प्रवास अंतरानुसार पासची रक्कम व कार्ड फी आकारून पावती दिली जाते. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभता दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी केंद्र शासनाच्या UDID कार्डच्या आधारे केली जात आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक आवश्यक असून बायोमेट्रिक पडताळणीनंतर माहिती फोटोसह प्रणालीत नोंदवली जाते. गर्दीमुळे नागरिक त्रस्त सध्या वल्लभनगर आगारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळपासूनच रांगा लागत असून केवळ एकच नोंदणी काउंटर उपलब्ध असल्याने नागरिकांना चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे.“किमान दोन नोंदणी एजंट नेमावेत,” आम्ही ४ तास झाले रांगेत थांबलो असून,यासाठी आगार प्रमुखांनी दखल घ्यावी, अशी मागणी स्मिता पुंढे महिला प्रवाशाने यांनी केली. “नोंदणीस ५ ते १० मिनिटे लागतात. भविष्यात कागदपत्रे हाताळण्याचा त्रास कमी होणार असला तरी सध्या तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे,” अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक काशिनाथ सावर्डेकर यांनी दिली. “स्थानक प्रमुखांनी नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी आगाराचा संपर्क क्रमांक २०२७४२०३०० या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून चौकशी करून येण्याचे आवाहन केले आहे. सध्या या स्मार्ट कार्डसाठी कोणतीही अंतिम मुदत शासनाने जाहीर केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये.” – वैशाली कांबळे, सहा. स्थानक प्रमुख