MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पेपरची पुन्हा तपासणी अन् SIT चौकशी होणार’
MPSC : विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. पेपरची पुन्हा तपासणी आणि पेपरफुटीच्या आरोपांची SIT चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकालावरून आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात पावणेदोन तास बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. तसेच पेपरफुटीच्या आरोपांची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात आठ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
बैठकीत परीक्षेतील गुणांची पुन्हा तपासणी करण्याबाबतही चर्चा झाली. मुलाखती पुढे ढकलण्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. परीक्षेशी संबंधित सर्व प्रश्न व्ही. राधा समितीसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
माहितीच्या अधिकाराखाली विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि पेपर उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. गुणांशी संबंधित प्रश्नांवर दळवी समितीच्या माध्यमातून निर्णय घेतला जाणार आहे.
पेपरफुटीच्या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मात्र कायम असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. परीक्षा पद्धतीत योग्य बदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आहे.




