Monsoon Delayed: धोक्याची घंटा! २० जून उजाडला तरी पाऊस गायब; १० वर्षांतील ‘हा’ धडकी भरवणारा इतिहास पुन्हा घडणार?
Monsoon Delayed: पवना, आंद्रा, वडिवळे धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर; मावळातील विलंबाचा पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम.

Monsoon Delayed – मावळ तालुक्यात दरवर्षी मान्सूनच्या आगमनाकडे शेतकरी आणि नागरिक आशेने पाहत असतात. यंदा देशात मान्सूनचे आगमन ४ जून रोजी झाले असताना मावळ तालुक्यात ३ जून रोजीच ३ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. जून महिना अर्धा संपत आला तरी अद्याप मावळात मान्सूनचे आगमन झाले नाही. गेल्या दहा वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता केवळ दोनदाच मान्सूनचे आगमन १५ जूननंतर झाले होते.
या दोन्ही वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदा २० जून आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला मावळ तालुका राज्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांपैकी एक मानला जातो. तालुक्यातील पवना, आंद्रा, वडिवळे, ठोकळवाडी यांसारखी महत्त्वाची धरणे, शेतजमिनी तसेच भूजलसाठे हे मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे मावळात मुबलक पाऊस पडणे हे केवळ मावळसाठीच नव्हे तर पिंपरी-चिंचवडसाठी देखील गरजेचे असते. दरवर्षी पहिला पाऊस कधी पडतो आणि त्यानंतरचा मान्सून कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष असते.
मावळ तालुक्याच्या अनुषंगाने गेल्या दशकाचा अभ्यास केला असता, २०१६ मध्ये मावळ तालुक्यात पहिला पाऊस २० जून रोजी पडला. केवळ १ मिमी पावसाने पावसाळ्याची सुरुवात झाली आणि त्यावर्षी पावसाळ्यात केवळ १९२७ मिमी पाऊस पडला. त्यानंतर २०१७ मध्ये १७ जून रोजी २१ मिमीचा पहिला पाऊस झाला आणि वर्षअखेरीस २४२४ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. २०१८ हे वर्ष मावळसाठी विशेष ठरले. २ जून रोजी १२ मिमीचा पहिला पाऊस पडला आणि त्यानंतर मान्सूनने चांगली साथ दिली. परिणामी वर्षभरात ३५८४ मिमी पावसाची नोंद झाली.
२०१९ मध्ये ९ जून रोजी ३० मिमीचा दमदार पहिला पाऊस झाला आणि त्या वर्षी ३३७१ मिमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले. गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक पाऊस २०२० साली पडला होता. यावर्षी दोन जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि एकूण पावसाने ४००० मिमीची सीमा ओलांडली होती. दुसरीकडे २०२१ मध्ये १ जूनलाच पहिला पाऊस पडला होता. अनेकांना त्या वर्षी विक्रमी पावसाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात वर्षभरातील एकूण पर्जन्यमान केवळ १९३३ मिमी इतकेच राहिले.
२०२२ मध्ये ९ जून रोजी ५ मिमीचा पहिला पाऊस झाला आणि वर्षभरात २७२२ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले. २०२३ मध्ये ४ जून रोजी ५ मिमी पाऊस पडला, तर वर्षभरात २८०९ मिमी पाऊस झाला. २०२४ मध्येही ४ जून रोजीच ५ मिमी पावसाने हंगामाची सुरुवात झाली आणि एकूण पर्जन्यमान २८२२ मिमीपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये १ जून रोजी ९ मिमीचा पहिला पाऊस पडला होता. त्यानंतर मान्सूनने संपूर्ण हंगामात जोरदार हजेरी लावली. परिणामी वर्षभरात ३६३६ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दशकातील सर्वाधिक पावसाच्या वर्षांमध्ये २०२५ चा समावेश झाला.
धरणसाठाही चिंताजनक
पावसाने उशीर केल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे. उन्हाळ्यातील वाढत्या वापरामुळे अनेक जलसाठ्यांची पातळी खाली आली आहे. विशेषतः पवना धरणातील उपलब्ध पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.






