Mohan Bhagwat: ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय? ; लंडनमध्ये मोहन भागवत यांनी स्पष्ट केली RSSची भूमिका
Mohan Bhagwat: लंडनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

Mohan Bhagwat: लंडनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे कोणताही विशिष्ट धर्म, उपासनेची पद्धत किंवा जीवनशैली नव्हे, तर विविध विचार आणि विविधतेचा स्वीकार करणारी वृत्ती आहे, असे भागवत यांनी सांगितले.
‘एकतेसाठी सर्वांनी एकसारखे असण्याची गरज नाही’ Mohan Bhagwat:
प्रश्नोत्तराच्या सत्रात हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाच्या संकल्पनेवर बोलताना भागवत म्हणाले की, ‘हिंदू’ हा शब्द केवळ एखाद्या धार्मिक प्रथा किंवा जीवनपद्धतीपुरता मर्यादित नाही. विविधतेचा आदर करणे आणि ती स्वीकारणे हा हिंदू वृत्तीचा मूलभूत स्वभाव असल्याचे त्यांनी म्हटले.
भारतामध्ये नास्तिकतेसह विविध विचारधारा विकसित झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असू शकतो, मात्र अंतिम ध्येय एक असू शकते. त्यामुळे एकमेकांचे धर्मांतर करण्याची गरज नाही. ‘आम्ही बरोबर आहोत आणि तुम्हीही बरोबर आहात’, हीच हिंदू वृत्ती असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.
‘विविधता नैसर्गिक, तर ऐक्य हेच सत्य’
राष्ट्र आणि राष्ट्र-राज्य यातील फरक स्पष्ट करताना भागवत यांनी सांगितले की, राष्ट्र-राज्य हे भाषा, धर्म किंवा शासनव्यवस्थेसारख्या समान आधारांवर लोकांना एकत्र आणते आणि सर्वांसाठी समान नियम लागू करते. मात्र हिंदू राष्ट्राची संकल्पना जगाला विविधता ही नैसर्गिक गोष्ट असल्याचा आणि ऐक्य हेच अंतिम सत्य असल्याचा संदेश देण्यावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतावर अनेक वेळा आक्रमणे झाली, देश गुलाम झाला; मात्र या सर्व परिस्थितीतही भारताचे राष्ट्र म्हणून अस्तित्व कायम राहिले, असा दावा भागवत यांनी केला. समान उद्देशाने जोडलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र, अशी त्यांची व्याख्या आहे.
‘तरुणांवर माझा अधिक विश्वास’ Mohan Bhagwat:
आजच्या पिढीकडून प्रेरणा मिळते का, असा प्रश्न विचारण्यात आला असता भागवत यांनी भविष्यातील पिढीवर अधिक विश्वास असल्याचे सांगितले. तरुणांना जग अधिक चांगले बनवण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी ते छोटे-मोठे मतभेद बाजूला ठेवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.
तरुणांना केवळ एखादी विशिष्ट पद्धत शिकवण्याऐवजी त्यांच्यासमोर ध्येय निश्चित केले पाहिजे. ‘पद्धत नाही, ध्येय निश्चित करा’, असे भागवत यांनी म्हटले. त्यानंतर तरुण स्वतः त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे अधिक प्रभावी मार्ग शोधू शकतात, असे त्यांनी सांगितले.
ब्रिटन-भारत संघर्षाच्या प्रश्नावर काय म्हणाले?
ब्रिटन आणि भारताच्या हितसंबंधांमध्ये भविष्यात संघर्ष निर्माण झाला, तर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदूंनी कोणाची बाजू घ्यावी, असा प्रश्न भागवत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ब्रिटिश हिंदू आपली ‘कर्मभूमी’ असलेल्या ब्रिटनशी गद्दारी करणार नाहीत, असे स्पष्ट केले.
‘हिंदुत्व तुम्हाला तुमच्या कर्मभूमीशी गद्दारी करायला सांगत नाही,’ असे भागवत म्हणाले. त्यामुळे अशा परिस्थितीत ब्रिटनमध्ये राहणारे हिंदू स्वाभाविकपणे ब्रिटनला पाठिंबा देतील, हेही त्यांनी मान्य केले.
‘विभाजित करणाऱ्या गोष्टींपेक्षा समानतेवर भर द्या’
हिंदू ऐक्याचा अर्थ स्पष्ट करताना भागवत यांनी मतभेदांपेक्षा समान मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींपेक्षा आपल्याला एकत्र आणणाऱ्या बाबींवर अधिक भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘जागतिक विचार करा, स्थानिक कृती करा’
आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क मोहिमेअंतर्गत लंडनमध्ये हा कार्यक्रम झाला. संघाकडून जगभरातील विविध भागांमध्ये आपली पोहोच वाढवण्याबरोबरच संघटनेचे कार्य आणि विचार याबाबत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी भागवत यांनी न्यूयॉर्क आणि टोरोंटो येथेही अशाच कार्यक्रमांना संबोधित केले आहे.
लंडनमधील कार्यक्रमात सेवा कार्यावरही भागवत यांनी भाष्य केले. सेवा निस्वार्थपणे केली पाहिजे आणि सेवा केल्यामुळे कोणी महान ठरत नाही, असे त्यांनी म्हटले. ‘जागतिक विचार करा आणि स्थानिक पातळीवर कृती करा’, या दृष्टिकोनाचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी सुमारे २० संघटनांनी त्याला विरोध करत आंदोलन केले होते. तसेच लंडनच्या महापौरांना पत्र लिहून कार्यक्रमाबाबत आपली भूमिका मांडण्यात आली होती.






