India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान सामन्यावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया; पहा काय बोलत आहेत लोक…

India-Pakistan Cricket Match : दुबईत रविवारी होणाऱ्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे. क्रिकेटप्रेमी या सामन्याबाबत उत्साहात असले, तरी भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही जण या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.
सामना पाहण्याऐवजी टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहनही काहींनी केले आहे. सोशल मीडियावर याबाबत दोन परस्परविरोधी मते पाहायला मिळत आहेत – एक गट क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवण्याची मागणी करतो, तर दुसरा गट ऑपरेशन सिंदूर आणि सैनिकांच्या बलिदानाचा उल्लेख करत सामना न खेळण्याची भूमिका मांडतो.
लेफ्टनंट कर्नल विकास गुर्जर यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे, “आपल्या जवानांचे कुटुंबीय सर्वस्वाचा त्याग करतात. मग ते पती, मुलगा, वडील किंवा भाऊ असो. आपण एक छोटासा त्याग करू शकत नाही का? भारत-पाकिस्तान सामन्याचा रोमांच आपण टाळू शकत नाही का? काही उत्सव रक्ताने साजरे होतात, हे लक्षात ठेवायला हवे.”
दुसरीकडे, एका नेटकऱ्याने बीसीसीआयवर टीका करत म्हटले आहे, “बीसीसीआय इतक्या लवकर सैनिकांच्या अश्रूंना विसरली आहे का?” आणखी एका व्यक्तीने बीसीसीआय आणि भारत सरकारवर आरोप केला की, आशिया चषकात खेळण्यासाठी क्रिकेट संघाला पैशासाठी भाग पाडले गेले आहे. त्यांच्या मते, “राष्ट्रवाद आता फक्त निवडणुकीपुरता आणि मतांसाठी मर्यादित झाला आहे.”
एकाने ‘एक्स’वर लिहिले, “पहलगाममध्ये २६ निष्पापांचा जीव गेला, आपले जवान शहीद झाले, तरीही बीसीसीआय पाकिस्तानबरोबर सामना खेळवण्यावर ठाम आहे. याला खरा न्याय म्हणायचे का? याला शहीदांचा सन्मान म्हणायचे का?” सोशल मीडियावरील या प्रतिक्रियांमधून सामन्याबाबतचा उत्साह आणि राजकीय तणाव यांच्यातील संघर्ष स्पष्ट होत आहे.





