नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात किरकोळ फेरबदल करण्यात आला आहे. या अधिवेशनाला 15 फेब्रुवारी पासून पहिल्या टप्प्यानंतरची सुट्टी दिली जाणार होती पण ती आता 13 फेब्रुवारी पासूनच दिल जाणार आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैया नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन नायडू यांनी केले. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे एकूण 25 नेते उपस्थित होते. मंत्र्यांनीही विषयांवर आपले मनोगत आटोपशीर ठेवावे अशी सूचना नायडू यांनी केली. संसदीय कामकाजात छोट्या पक्षांना संधी देण्याच्या गरजेवरही नायडू यांनी यावेळी जोर दिला.
ते म्हणाले की या पक्षाच्या सदस्यांना चर्चेत फारसा वाव मिळत नाही. तो त्यांना देण्याचा प्रयत्न यावेळी जाणिवपुर्वक केला जाईल. नायडू यांनी बोलावलेल्या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयुष गोयल, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, गृह निर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी इत्यादी उपस्थित होते.
विरोधी पक्षांतर्फे गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, देवेगौडा, भुपिंदर यादव, रामगोपाल यादव, द्रमुकचे त्रिची शिवा, राजदचे प्रेमचंद गुप्ता, आप चे संजय सिंह, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इलामरम करीम इत्यादी उपस्थित होते.