‘महिलांना प्रवासात सवलत दिल्यानेच एसटी तोट्यात’, सरकारच्या मंत्र्यांनीच दिली कबुली; महामंडळाला दिवसाला तब्बल ‘एवढे’ नुकसान

Pratap Sarnaik on ST Fare | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारद्वारे महिलांसाठी एसटी बसच्या तिकीटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यामुळे एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
एका पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी बोलताना सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात असल्याचे म्हटले आहे. यामुळे महामंडळाला दररोज 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचे विधान सरनाईक यांनी केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही. लाडक्या बहिणींना बसमध्ये 50% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
महिलांना दिलेल्या सवलतीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, बहिणींना 50 टक्के सवलत, जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये सवलत दिली आहे. त्या सवलतींमुळे एसटी बस दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपये तोट्यात आहे. आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर मला असे वाटते की एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांनाच सवलत देणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने 14.95 टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेतल्याने लालपरीतून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.





