रक्तटंचाईचे सावट; निवडणुकीमुळे शिबिरांचे आयोजन नाही

पुणे – दिवाळी सणाची सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्ताचा अपुरा साठा आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीतही केवळ पाच दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
दरवर्षी दिवाळीत सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते. अनेक महाविद्यालयांना तसेच खासगी कंपन्यांना दिवाळीची सुटी असल्यामुळे रक्तदान शिबिरे कमी होतात. यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. यावर्षी दिवाळीनंतर लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. शहरात राजकीय पक्ष आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. परंतु. यंदा विधानसभा निवडणूक आचारसंहिता या बाबींमुळे ही शिबिरे कमी झाली आहेत.
पुण्यात उपचारांसाठी राज्यभरातून रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. शहरात सुमारे ७८० छोटी-मोठी रुग्णालये आहेत. याचबरोबर एकूण ३५ रक्तपेढ्या आहेत. रुग्णांची संख्या मोठी असल्याने शहरात दिवसाला सुमारे दीड हजार रक्तपिशव्यांची गरज असते. सध्या, रक्त संकलन निम्मेच होत आहे. यामुळे रक्तपेढ्यांकडून गृहनिर्माण संस्था आणि नियमित रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले जात आहे.
गृ़हनिर्माण संस्थांमध्ये छोटी शिबिरे आयोजित करून रक्तसंकलन केले जात आहे. याचबरोबर दिवाळी सुट्या संपल्याने खासगी कंपन्यांनाही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन रक्तपेढ्या करीत आहेत. शहरातील रक्ताची टंचाई दोन आठवड्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता रक्तपेढ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
“ससून रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा पाच दिवसांचा साठा शिल्लक आहे. शस्त्रक्रियांची संख्या वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. नियमित रक्तदात्यांना आवाहन करून सध्याची गरज पूर्ण केली जात आहे. आगामी काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून रक्तसाठा पुरेशा प्रमाणात वाढेल.” – डॉ. मंगेश सागळे, प्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी
“आमच्याकडे दररोज ५० ते ७० रक्तपिशव्यांची मागणी आहे. सध्या ३ ते ४ दिवसांचा साठा शिल्लक आहे. सर्वसाधारणपणे आमच्याकडे १० ते १५ दिवसांचा साठा शिल्लक असतो. गेल्या आठवड्यांत नियमित रक्तदात्यांनी आम्ही केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. या आठवड्याच्या अखेरीस शनिवारी आणि रविवारी रक्तदानाचे आवाहन नियमित रक्तदात्यांना केले आहे.” – डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी





