मुंबई – सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्रात नागपूर येथे मायक्रोसॉफ्टच्या एआय टूलचा वापर यशस्वीरित्या झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चौकशीचा वेग 80 टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी दिली. नडेला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीच्या आगामी प्रकल्पाचा बाबत चर्चा केली. सायबर सेक्युरिटीसंदर्भातील प्रकल्प महाराष्ट्रातील इतर भूभागात राबविण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. त्यासाठी डेटा संकलन आणि विश्लेषण अतिशय महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष पुणीत चंडोक यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता रोजगार हिरावून घेणार नाही. मात्र आगामी काळात आपल्याला या क्षेत्रातील कौशल्य शिकण्याची गरज आहे. अन्यथा जे कौशल्य शिकणार नाहीत ते संदर्भहीन होण्याचा धोका आहे. आगामी काळात निरंतर शिकणार्यांचा रोजगार सुरक्षित राहणार आहे असेही त्यांनी नमूद केले.