Metro Slab Collapsed : मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. ‘वडाळा-ठाणे-कासारवडवली’ मेट्रो लाइन ४ च्या बांधकामादरम्यान एलबीएस रोडवर मेट्रोच्या पिलरचा काँक्रीट स्लॅब (Metro Slab Collapsed) उंचावरून खाली कोसळला. हा स्लॅब खालून जात असलेल्या एका ऑटोरिक्षावर आणि एका कारवर कोसळला, ज्यामुळे रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले. या भीषण दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख रामधन यादव अशी झाली आहे. जखमींमध्ये राजकुमार इंद्रजीत यादव (४५, आयसीयूमध्ये), महेंद्र प्रताप यादव (५२) आणि दीपा रुहिया (४०) यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटना सुमारे दुपारी १२:१५ ते १२:२० च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, एमएमआरडीएचे कर्मचारी, स्थानिक वॉर्ड अधिकारी आणि रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे एलबीएस रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, परिसरात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली आहे. Metro Slab Collapsed मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया या दुर्दैवी घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघाताची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मृत व्यक्तीच्या वारसांना राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. महापौर रितू तावडे यांची भेट मुंबई महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी या दुर्घटनेला ‘पूर्णपणे निष्काळजीपणाचा परिणाम’ असल्याचे म्हटले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही मेट्रो प्रकल्पावर अनेकदा सुरक्षेचे मुद्दे ऐरणीवर आले होते. या घटनेमुळे मुंबईतील मेट्रो बांधकामाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एमएमआरडीए आणि संबंधित यंत्रणांकडून लवकरात लवकर चौकशी अहवाल आणि आवश्यक उपाययोजना जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ माजली असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.