Rakesh Ranjan – झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी आणि मर्चंट नेव्हीचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे निधन झाले आहे. राकेश रंजन सिंह हे अवाना या जहाजावर कार्यरत होते, जे पश्चिम आशियातील इराण-इस्रायल तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकले होते. रांचीमधील त्यांचं कुटुंब या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहे. कुटुंबीयांच्या दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन राकेश रंजन सिंह गेल्या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी आपली रजा पूर्ण करून अवाना जहाजावर रुजू झाले होते. हे जहाज तेल घेण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीला गेले होते. तेल भरल्यानंतर हे जहाज १ मार्च रोजी भारताकडे निघाले, परंतु युद्धाच्या परिणामामुळे दुबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर समुद्रात नांगर टाकून थांबले होते. कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी अवाना जहाजावर होते. ते गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकले होते. या काळात कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना नियमित वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ दुबई एटीसीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांना बोटीने दुबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले, पण या प्रक्रियेला बराच वेळ लागला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.