Masap Election 2026 – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतमोजणीत अनेक गैरप्रकार झाले, असा आरोप करत परिवर्तन गटाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखद यांच्या खंडपीठाने बुधवारी फेटाळली. मसाप निवडणूक मंडळाचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी, संजीव खडके आणि गिरीश केमकर यांच्या वतीने ॲड. अभिषेक अवचट आणि ॲड. प्रल्हाद परांजपे यांनी मांडलेले मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले. मसापच्या बहुचर्चित निवडणूकीत पराभव झाल्यानंतर परिवर्तन गटाने सदर निवडणुक मुक्त व निष्पक्ष पद्धतीने घेण्यात आल्या नाहीत, असा आरोप केला आणि निवडणूक मंडळाच्या कथित अनियमितता व तटस्थपणावर प्रश्न उपस्थित करणारी रिट याचिका परिवर्तन गटाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. निवडणूक मतमोजणीबाबतच्या तुमच्या तक्रारी सक्षम अधिकाऱ्यांकडे का केल्या नाहीत? तसेच, नव्या कार्यकारणीस आम्ही प्रतिबंध का करावा, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर अर्जदारांकडून कोणताही खुलासा न झाल्याने परिवर्तन गटाचे मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी आणि सुनीताराजे पवार यांची याचिका दाखल करून घेण्यास न्यायालयाने नकार दिला. परिवर्तनच्या उमेदवारांकडून झालेल्या आरोपांनंतर बदनामी केल्याबद्दल अब्रू नुकसानीची फौजदारी आणि दिवाणी कारवाई करण्याची तयारी निवडणूक मंडळाचे अधिकारी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. “परिवर्तन गटाने धर्मादाय आयुक्तांकडे जाण्याऐवजी थेट उच्च न्यायालयात जाऊन फेरमतमोजणी करण्याची मागणी केली होती. निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी, निकालाच्या दिवशी अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीचा अर्ज केला असता, निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला, असा खोटा दावा सादर केला. त्यांनी केलेल्या तक्रार अर्जात कुठेही फेरमतमोजणी हा शब्दच नव्हता.” – ॲड. अभिषेक अवचट