‘ऑपरेशन सिंदूर’ने मरियम नवाज घाबरली! परमाणु धमकी देणाऱ्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लागू केली आणीबाणी

operation sindoor : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. 6-7 मे च्या मध्यरात्री 1:05 ते 1:30 वाजेदरम्यान राफेल विमानांनी स्कॅल्प आणि हॅमर मिसाइल्सच्या साहाय्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडाली असून, परमाणु बाॅम्बची धमकी देणाऱ्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी घाबरून संपूर्ण प्रांतात आणीबाणी लागू केली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने निवेदन जारी करत सांगितलं, “मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बुधवारी बंद ठेवण्यात आल्या असून, पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.”
रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरी संरक्षण यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे. पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती, परंतु आता ती अंशतः खुली करण्यात येत आहे.
22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला होता, त्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराने दावा केला की, या हल्ल्यात 26 नागरिक ठार आणि 46 जखमी झाले, परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे.
यापूर्वी मरियम नवाज यांनी पहलगाम हल्ल्यानंतर एका कार्यक्रमात भारताला परमाणु धमकी देत म्हटलं होतं, “पाकिस्तान एक परमाणु शक्ती आहे, कोणीही आमच्यावर सहज हल्ला करू शकत नाही. अल्लाहने आमच्या सैन्याला ताकद दिली आहे.” मात्र, ऑपरेशन सिंदूरच्या दणक्याने त्यांची ही बडबड थांबली असून, पंजाबात आणीबाणी लागू करावी लागली. भारताच्या या कारवाईने दहशतवादाविरुद्धच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर पुन्हा शिक्कामोर्तब झालं आहे.





