मरियम नवाज यांनी व्यक्त केली क्लायमेट डिप्लोमसीची गरज; जयशंकर यांच्या पाक दौऱ्यापूर्वी मांडला प्रदूषणाचा मुद्दा

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी धुक्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी क्लायमेट डिप्लोमसीचा सल्ला दिला आहे. धूक्याबाबत भारताशी चर्चा आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेषत: जेव्हा दोन्ही देशांमध्ये हिवाळा येत असतो, त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. मरियम नवाज या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत.
आपण भारताशी बोलले पाहिजे. याला क्लायमेट डिप्लोमसी म्हणतात. या डिप्लोमसीची भारतासोबत गरज आहे असे नमूद करत विषारी धूर कमी करण्यासाठी समन्वयपूर्ण प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. वाऱ्यामुळे विषारी धूर सीमेपलीकडे पसरू शकतो. पाकिस्तानात हिवाळ्यात दरवर्षी श्वसनाचे आजार वाढतात. जेव्हा तापमान खाली येते तेव्हा प्रदूषक तत्व जमिनीजवळच अडकून राहतात. त्यामुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढते.
पाकिस्तानातील लाहोर आणि भारतातील दिल्लीसह अनेक शहरे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. दरम्यान, शांघाय सहकार्य शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर पाकिस्तानला जाणार आहेत. डॉ जयशंकर यांची ही जवळपास दशकभरातील पहिली अधिकृत भेट आहे. मात्र, या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार नसल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
सन 2019 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये घट झाली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या पाकिस्तान भेटीचे वर्णन सकारात्मक पाऊल म्हणून केले आहे. यामुळे दोन शेजारी देशांमधील तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
15 आणि 16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबाद येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेत सहभागी होण्यासाठी जयशंकर शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याचे भारताने शुक्रवारी जाहीर केले. मात्र, पाकिस्तान दौऱ्यात द्विपक्षीय चर्चेची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.





