Manoj Jarange : ‘सरकार स्थापन झाल्यावर बेमुदत उपोषणाला बसणार’; नवं सरकार बनण्याआधीच मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange । Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी पलटवली आहे.
महायुतीला प्रचंड यश मिळाले असून महाविकास आघाडीची धूळधाण झाली आहे. एकट्या भाजपने 145 जागा मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.
या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आलं आहे. सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला असून, राज्यात नवं सरकार कोणत्या दिवशी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अश्यातच मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकादा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी आज बीड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जाहीर केलं की “सरकार स्थापन झाल्यावर मी तारीख जाहीर करेन. त्या तारखेपासून मी आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे”.
यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की “तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केलं असेल, तुम्ही ज्यांना मतदान केलं ते उमेदवार निवडूनही आले असतील. त्या आमदारांशी आरक्षणासाठी भांडा. तो आमदार भाजपाचा असेल, काँग्रेसचा असेल, महाविकास आघाडी किंवा महायुतीचा असेल, मराठ्यांनी आता एकजूट करून त्या आमदारांना आरक्षणासाठी मदत करण्याचं आवाहन करा.
आपल्याला आरक्षण मिळवावंच लागेल. त्यासाठी सर्व मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक बेमुदत उपोषणाला बसायचं आहे. सरकार स्थापन झालं की मी प्रसारमाध्यमांद्वारे उपोषणाची तारीख सांगेन. त्या तारखेला अंतरवाली सराटीला या. उपोषणाच्या तयारीला लागा. तत्पूर्वी तुमची शेतातील कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की मी उपोषणाची तारीख सांगणार आहे. प्रत्येक कुटुंबातील काही सदस्यांनी उपोषणासाठी या. असं ते यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, निवडणुकीचं, राजकारणाचं खुळ आता डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका. तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल. परंतु, तुमच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकरांच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकराला शाळा, महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर तिथे तो मदत करणार नाही. त्यामुळे आरक्षणासाठी तुटून पडा’. असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले.





