मुंबई : पाच दिवस चाललेल्या मराठा आंदोलनानंतर अखेर मुंबई शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आंदोलकांनी मुंबई सोडल्याने मुंबई महानगरपालिकेने देखील परिसर स्वच्छ केला आहे. मात्र पाच दिवसांनंतर हा परिसर स्वच्छ करताना बीएमसीच्या कर्मचा-यांची चांगलीच दमछाक झाली. आझाद मैदान परिसरातून १०१ मेट्रिक टन कचरा गोळा करत मोठी स्वच्छता मोहीम राबवली आहे. २ सप्टेंबर रोजी मंगळवारी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर, दक्षिण मुंबईचे रस्ते आंदोलकांच्या गर्दीतून मोकळे झाले. दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास, पोलीस आणि आरएएफ दलांनी सीएसएमटी स्टेशन परिसर मोकळा करण्यासाठी पावले उचलली. तर रेल्वे कर्मचा-यांनी आंदोलकांना जागा खाली करण्याची घोषणा केली. आंदोलक निघून गेल्यानंतर, महापालिका आणि रेल्वे प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान कचरा साफ करण्याचे होते. २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत, महापालिकेने आझाद मैदान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून १०१ लाख किलो म्हणजेच १०१ मेट्रिक टन कचरा गोळा केला. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर, महापालिकेने मध्यरात्रीच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू केले. सोमवारच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये ४०० हून अधिक स्वच्छता कर्मचारी कामाला लागले, तर मंगळवारी सकाळपासून १,००० कर्मचा-यांनी काम सुरू केले. स्वच्छतेचे काम सोपे करण्यासाठी, महापालिकेने दोन मिनी कॉम्पॅक्टर आणि एक मोठा कॉम्पॅक्टर तसेच पाच लहान कचरा संकलन वाहने वापरली. याव्यतिरिक्त, आंदोलनस्थळी सुमारे २,००० कचरा पिशव्या वाटण्यात आल्या आणि कचरा कुंड्याही उपलब्ध करून देण्यात आल्या. मराठा आंदोलकांचाही मदतीचा हात मैदान आणि परिसरात स्वच्छता राखण्याकरता सहकार्य करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलक बांधवांनीसुद्धा कचरा गोळा करणयासाठी सहकार्य केले. महानगरपालिका प्रशासनाकडून आझाद मैदान आणि परिसरात पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालये आदी सोयी-सुविधाही पुरवण्यात आल्या होत्या.