Manoj Jarange : मनोज जरांगेंचे मराठा बांधवांना मुंबईला जाण्याचे आवाहन; तारीखही सांगितली…
Manoj Jarange : 'मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही'

Manoj Jarange : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. यादरम्यान त्यांनी फडणवीस सरकारला मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना 12 सप्टेंबरपूर्वी मुंबईला जाण्याचे आवाहन केले आहे. याबाबत जरांगे म्हणाले, “सरकारकडून कुणीही संपर्क साधलेला नाही. मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईत जाणारच. जमेल तसं मराठ्यांनी मुंबईकडे निघावे. मित्रांकडे- पाहुण्यांकडे जाऊन राहावे. १२ तारखेपर्यंत मुंबईला जा आणि घाबरू नका. पाहुणे, मित्र यांच्याकडे राहा. फक्त कोणीही मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला आणि आझाद मैदानावर जाऊ नका. मराठे मुंबईत आलेले त्यांना कळले नाही पाहिजे.”
पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलीस स्टेशनला जा, उलट तिथे चांगली सोय होते. उपोषण सोडणार नाही, मी बरोबर मुंबईत जातो, अशी घोषणा जरांगे यांनी केली.
“येत्या २ ते ३ दिवसांत मुंबईतील आपल्या लोकांना शोधा आणि त्यांच्याकडे जाऊन राहा. पोलिसांना आपल्याला त्रास द्यायचा नाही. टाईमपास करू नका. आपल्या गाड्यांना झेंडा लावून मुंबईकडे निघा. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही,” असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.
दरम्यान, जरांगे पाटलांच्या या नव्या आदेशामुळे राज्यातील मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. तर जरांगे पुन्हा एकदा मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार असल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :






