Manoj Bajpayee : मनोज बाजपेयींचा खुलासा : “मुंबईने मला कधीच आपलंसं केलं नाही, कधीतरी हे शहर सोडून जाईन”

Manoj Bajpayee: बॉलीवूडचे बहुप्रतिभावान अभिनेते मनोज बाजपेयी हे सध्या त्यांच्या नवीन चित्रपट “इन्स्पेक्टर झेंडे” मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होत असून, यात प्रेक्षकांना त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. याशिवाय तब्बल २७ वर्षांनंतर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यासोबत ते काम करत आहेत. अलीकडील मुलाखतीत त्यांनी केवळ आपल्या चित्रपटांबद्दलच नव्हे, तर मुंबईतील जीवन, कुटुंब आणि करिअरबाबतही खुलासे केले.
इन्स्पेक्टर झेंडे बद्दल
मनोज बाजपेयींना जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला मिळाली, तेव्हा त्यांना वाटले की ही गंभीर थ्रिलर फिल्म असेल. मात्र कथा पुढे वाचताना त्यांना जाणवले की यात कॉमेडी आणि हलकाफुलका अंदाजही आहे. “ही भूमिका करताना मला स्वतःमध्येही काहीतरी नवीन शोधता आलं,” असे ते म्हणाले.
कुटुंब आणि कामाचा ताण
अभिनयामुळे कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, याबद्दल ते स्पष्ट बोलले. “मुंबईच्या ट्रॅफिकमुळे घरी पोहोचेपर्यंत माझा परिवार झोपलेला असायचा. माझी मुलगी लहान असताना माझी वाट पाहत झोपून जायची, पण मी घरी गेल्यावर ती जागी व्हायची आणि मग पुन्हा झोपवणं कठीण व्हायचं. त्यामुळे शेवटी मी घराऐवजी सेटजवळच्या हॉटेलमध्ये राहू लागलो,” असे त्यांनी सांगितले.
भूमिकेतून बाहेर पडण्याची कसरत
मनोज यांनी सांगितले की, “शूल” या चित्रपटातील भूमिका त्यांच्यासाठी सर्वात कठीण ठरली. त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. “सत्या” मधील ‘भीकू मात्रे’ या पात्राचाही परिणाम त्यांच्या स्वभावावर झाला होता. “त्या काळात मी जास्त रागावायचो, शिव्या द्यायचो. पण अनुभव वाढल्यानंतर मी शिकलो की पात्र संपल्यानंतर त्यातून बाहेर कसं पडायचं,” असे ते म्हणाले.
मुंबईबद्दल नाराजी
मनोज बाजपेयींनी कबूल केले की त्यांना मुंबई शहराने कधीच आपलंसं वाटलं नाही. “ मुंबईने मला कधीच आपलेपण दिले नाही. एक दिवस कदाचित मी हे शहर सोडून देईन,” असे ते म्हणाले. मात्र अभिनयावरील प्रेमामुळे इंडस्ट्री सोडण्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही.





