मांजरी(प्रतिनिधी) : खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीला पूर आला आहे. या पूरामुळे मांजरी बुद्रुक व मांजरी खूर्द गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पोलिसांनी पूलावरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांनी येथून प्रवास न करता वाघोली व थेऊर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच येथील मुळा-मुठा नदीवर काही वर्षांपूर्वी सबमर्शिबल पूल बांधलेला आहे. क्षमता नसतानाही सध्या या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हा पूल नगर व सोलापूर महामार्गांना जोडणारा आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर सर्वप्रकारची खासगी व सार्वजनिक वाहतूक येथून होत आहे. तुटलेले कठडे यामुळे वाहतूकीसाठी आगोदरच धोकादायक झालेला हा पूल पूरामुळे आणखीनच धोकादायक झाला आहे.
“गेली चार दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच खडकवासला धारणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मुळा-मुठा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसांपूर्वीच वाढ झाली होती. पाण्याची पातळी वाढल्यानंतर मंगळवारी ( दि.१२) मांजरी बुद्रुक येथील पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. दरम्यान, ब्यारिकेट काढून वाहतूक सुरूच होती. तर आज पाणी पुलावरून जात असतानाही अनेकजण जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून ये- जा करत होते.”
रात्री आणि आज सकाळी व दुपारी टप्याटप्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील पूल पाण्याखाली गेला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत होती,त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पूलावरून पाणी वाहयला सुरुवात झाली. पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर बघ्यांची गर्दी जमली होती.