Manav Suthar Record : मानव सुथारने गॉलमध्ये रचला इतिहास! हरभजन सिंगचा १८ वर्षांचा जुना विक्रम मोडत केला खास पराक्रम
Manav Suthar Record : मानव सुथारने तब्बल १० विकेट्स घेत माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगचा तब्बल १८ वर्षे जुना विक्रम मोडला.

Manav Suthar Record 10 Wickets Match Haul IND vs SL Galle Test 2026 : श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फिरकीपटू मानव सुथारने (Manav Suthar) आपल्या फिरकीच्या जाळ्यात लंकन फलंदाजांना अडकवत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताने हा सामना १६५ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यात मानव सुथारने तब्बल १० विकेट्स (10-Wicket Haul) घेत माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांचा तब्बल १८ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
हरभजन अन् अश्विनला पछाडत बनला नंबर १!
मानव सुथारने गॉल कसोटीच्या पहिल्या डावात ७६ धावांत ४ विकेट्स घेतले, तर दुसऱ्या डावात ५५ धावांत ६ फलंदाजांना बाद केले. त्याने संपूर्ण सामन्यात १३१ धावांत १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यापूर्वी २००८ मध्ये हरभजन सिंगने १५३ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या, तर २०१७ मध्ये रविचंद्रन अश्विनने १६० धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. समान १० विकेट्स असल्या तरी सर्वात कमी धावा दिल्यामुळे सुथार आता श्रीलंकेविरुद्ध कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात सुथारने अवघ्या १० चेंडूंच्या अंतरात ४ फलंदाजांना तंबूत धाडले.
अवघ्या २ कसोटी सामन्यांत १७ विकेट्सचा डोंगर –
An absolute display of skill and precision as Manav Suthar picks up 10 wickets in the 1st Test.
A glimpse of how he fared in his last ten deliveries in the second innings 👌👌#SLvIND #TeamIndia pic.twitter.com/B3QVZdhPuG
— BCCI (@BCCI) August 19, 2026
आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात करणाऱ्या मानव सुथारने आतापर्यंत खेळलेल्या अवघ्या २ कसोटी सामन्यांत तब्बल १७ विकेट्स खिशात घातल्या आहेत. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पण करताना त्याने पहिल्याच डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या. कसोटीत दोनदा ५ विकेट्स हॉल घेणारा सुथार संघासाठी उपयुक्त वेळी फलंदाजीतही योगदान देतो, ज्यामुळे तो भारतासाठी एक भरवशाचा अष्टपैलू म्हणून पुढे येत आहे.
२३ ऑगस्टपासून कोलंबोत रंगणार दुसरी कसोटी –
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेचा व्हाईटवॉश करण्याचा आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलच्या शर्यतीतील आपली दावेदारी अधिक भक्कम करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.





