Mamata Banerjee : राजकीय महत्त्वाकांक्षेने भारले आहे ‘सिंदूर‘; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका

कोलकता : ऑपरेशन सिंदूरच्या मोहिमेला राजकीय फायद्याचा वास येत आहे. आता केंद्र सरकार या ऑपरेशन सिंदूरसाठी गावागावात जाऊन सिंदूरचे वाटप करणार असल्याचे समजते. सैन्य दलांच्या विजयाचे हे फक्त राजकारण नव्हे काय, असा प्रश्न तृणमूल काॅंग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.गुरुवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी सरकारला घेरले. त्याला ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नबन्नामध्ये म्हटले आहे की, आज मोदीजींनी जे सांगितले आहे ते आम्हाला धक्कादायकच नाही तर आमच्या पंतप्रधानांकडून हे ऐकून खूप दुःख झाले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून होणाऱ्या राजकारणावर बोलण्यासारखे खूप आहे. भाजपही त्यामध्ये सामील आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूरचे नाव राजकीय आकर्षण मिळवण्यासाठी जाणूनबुजून देण्यात आले. जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन देशाच्या हितासाठी परदेशात पोहोचत आहेत, तेव्हा केंद्र सरकार राजकीय होळी खेळत आहे.
आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात आहोत, पण पंतप्रधान मोदी देशभरात सभा घेण्यात व्यस्त आहेत. आमचा विरोधी पक्ष जगात देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. ते देश आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी धाडसी निर्णय घेत आहेत. आम्ही नेहमीच आपल्या देशाचे रक्षण करू, कारण ती आपली मातृभूमी आहे. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही बोलण्याची वेळ आली आहे का?
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत, त्यांचे नेते म्हणत आहेत की, ते ऑपरेशन सिंदूरसारखे ऑपरेशन बंगाल करतील. मी त्यांना आव्हान देते! जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्या निवडणुका घ्याव्यात. आम्ही तयार आहोत आणि बंगाल तयार आहे. कृपया लक्षात ठेवा की वेळ ही एक घटक आहे.





