Mallikarjun Kharge : महिला आरक्षण मोदींनीच हाणून पाडले; मल्लिकार्जुन खर्गे यांचा पलटवार
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केलेल्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोमवारी चोख प्रत्युत्तर दिले.

Mallikarjun Kharge : महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केलेल्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोमवारी चोख प्रत्युत्तर दिले.
महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच केले आहे. आम्ही केवळ सीमांकन विधेयकाचा विरोध केला होता, महिला आरक्षणाचा नाही, असा दावा खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केला.
सन २०२९ पासून लागू होणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पारीत होवू न शकल्यानंतर, पंतप्रधानांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी या विधेयकाची ‘गर्भहत्या’ केल्याची टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना खर्गे म्हणाले, मोदीजी, तुम्हीच महिला आरक्षणाचा गळा घोटला आहे.
आम्ही महिलांच्या हक्कांच्या विरोधात कधीच नव्हतो. काँग्रेसने नेहमीच महिला कल्याणाला प्राधान्य दिले आहे. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या कणखर महिला नेत्यांचे नेतृत्व आमच्या पक्षाला लाभले आहे, हे विसरू नका, असे खर्गेंनी सुनावले.
खर्गे यांनी आपल्या भाषणात सीमांकन प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत सांगितले की, आरक्षणाची अंमलबजावणी भविष्यातील जनगणनेवर आणि सीमांकनावर अवलंबून ठेवणे ही महिलांची फसवणूक आहे. बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या या विधानाने महिला आरक्षणाचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राज्याचे दौरे आणि सभा घेत आहेत. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
पंतप्रधान ज्या प्रकारे बंगालमधील गल्लीबोळांत फिरून प्रचार करत आहेत, ते पाहता त्यांना या राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा खोचक सवाल खर्गे यांनी कूचबिहार येथील सभेत विचारला.
बंगालच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे रक्षण केवळ काँग्रेस व मित्रपक्षच करू शकतात, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपच्या आक्रमक प्रचारावर निशाणा साधला. या विधानामुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.






