Makarand Patil : मंत्री मकरंद पाटलांचा आदर्श निर्णय! वाढदिवस रद्द करत, म्हणाले..’बळीराजाच्या पाठीशी उभे रहा’

प्रभात वृत्तसेवा
सातारा – राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे भान राखत यावर्षी वाढदिवस (दि. २९) साजरा न करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आहे. समर्थक, हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर्स, जाहिराती, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश भागात अतिवृष्टी आणि महापूरामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जमीन खरडून गेल्याने रब्बी हंगामातील पेरणी करणेही अशक्य असल्याने शेतकरी संकटाच्या छायेत आहेत. त्यामुळे वाढदिवस साजरा करणार नसल्याची भूमिका मंत्री मकरंद पाटील यांनी घेतली आहे.
तसेच उद्या वाढदिवशी सातारा येथील निवासस्थानी उपलब्ध नसणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. जनतेचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत. परंतु, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हितचिंतकांनी अतिवृष्टीग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे यांनी मंत्री मंकरंद पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.





