स्थानिक पोलिसांच्या मदतीने ATS ची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातील या भागातून दोन बांगलादेशींना घेतले ताब्यात

Pune News : काल मध्यरात्री साधारण १.०५ वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पहलागम येथे १५ दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला असून पाकला चोख पत्युत्तर दिले आहे.
या मोहिमेला अॅापरेशन सिंदूर हे नाव देण्यात आले होते. भारताने केलेल्या या मोठ्या कारवाईचे कौतुक सर्वत्र होत आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. याचदरम्यान, पुण्यात एटीएसच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन बांगलादेशींना एटीएसने ताब्यात घेतले आहे.
पुणे ग्रामीणच्या पुणे जिल्ह्यातील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेल्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून भारतीय बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. तसेच दोघांचे बांगलादेशी पासपोर्ट विसा देखील संपलेले आहेत. ते देखील पोलिसांनी कारवाईत जप्त केले आहेत.
ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि त्याचा मित्र अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८) दोघेही (राहणार ओतूर मूळ राहणार बोकराई जि. खारखीरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, शरद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तांदळवाडे यांनी ओतूर पोलीस स्टेशनमार्फत केली आहे.





