Assam crime : मानवी तस्करीविरोधात मोठी कारवाई; आसाममधील ११५ जणांची बिहारमधून सुटका
आसामच्या विविध भागांतून मानवी तस्करी करणाऱ्या एका संशयित टोळीच्या तावडीत सापडलेल्या ११५ जणांची बिहारमधून यशस्वी सुटका करण्यात आली आहे.

Assam crime – आसामच्या विविध भागांतून मानवी तस्करी करणाऱ्या एका संशयित टोळीच्या तावडीत सापडलेल्या ११५ जणांची बिहारमधून यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
यामध्ये मोठ्या संख्येने अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. सशस्त्र सीमा दलाच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रकरणी ९ तस्करांना अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, सर्व पीडितांना आसाममध्ये सुरक्षित परत आणण्यात आले असून सध्या त्यांचे समुपदेशन सुरू आहे.ही टोळी प्रामुख्याने आसाममधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना, विशेषतः भूतान सीमेला लागून असलेल्या भागातील लोकांना लक्ष्य करत होती.
पीडितांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फूस लावून नेण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या ११५ जणांमध्ये ४८ महिला आणि मुली असून, त्यातील अनेक अल्पवयीन आहेत.
मुलांशी संपर्क होऊ न शकल्याने काही पालकांनी तेजपूर येथील एसएसबीकडे मदत मागितली होती. त्यानंतर एसएसबी, बिहार पोलीस आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणेने बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात संयुक्त मोहीम राबवून ही यशस्वी सुटका केली. या आंतरराज्यीय मानवी तस्करी प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





