Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे रस्ते धरलेल्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि शिवसेना यांच्या महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. या वादाची पहिली ठिणगी रायगड जिल्ह्यात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी सहकारी पक्षांना थेट इशारा देत भविष्यात लोकसभा, विधानपरिषद आणि इतर निवडणुकांबाबत “वेगळा विचार करावा लागेल”, असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला. स्थानिक निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली होती. निवडणुका संपल्यानंतरही काही भागात अंतर्गत वाद कायम असल्याचे दिसत आहे. रायगडमध्ये तर शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले, “महायुतीत एकत्र आहोत तर राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही एकत्र येणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही तर भविष्यातील निवडणुकांमध्ये वेगळा विचार करावा लागेल.” त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “त्यांना आमची गरज नसेल तर त्याचाही विचार केला जाईल.” पालकमंत्रिपदावरही सूचक वक्तव्य रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता गोगावले यांनी, “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय,” अशी प्रतिक्रिया दिली. महाड येथील छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. वीरेश्वर महाराजांना साकडं घातल्याचा उल्लेख करत त्यांनी आशावादी भूमिका व्यक्त केली. महायुतीत सध्या उघड फुट नसली तरी रायगडमधील घडामोडींमुळे तणाव वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील काही दिवसांत या वादावर तोडगा निघतो की राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.