Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी पलटवली आहे. महायुतीला प्रचंड यश मिळाले असून महाविकास आघाडीची धूळधाण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपने 145 जागा मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरी यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अश्यातच आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार? असं देखील विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘येत्या 30 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रिपदाचा आणि मंत्रिपदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. आता नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे 10 आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.