Maharashtra Weather Update : मागील आठवड्यापासून महाराष्ट्र मध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून दुपारच्या वेळी रस्ते तुलनेने ओस पडलेले दिसत आहेत. नेहमीप्रमाणे विदर्भात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे देशातील सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे अकोला हा देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरला. कुठे किती तापमान? अमरावती – ३८.२ अंश, वर्धा – ३८अंश, धुळे (कृषी महाविद्यालय) – नीचांकी १२.८ अंश, राज्यातील अनेक भागांत पारा ३५ अंशांच्या पुढे आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाड्यात अधिक भर पडत असून उष्णतेचा चटका नागरिकांना जाणवत आहे. मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट बुधवारी मुंबई सह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने भारतीय हवामान विभाग (IMD) कडून ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.