नांदेड – त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती होती.
नांदेड शहरात देखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. तसेच दुकाने आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. यामुळे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली. त्यामुळं जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.