Maharashtra Vidhan Sabha Election : दिवाळी आधी की दिवाळीनंतर…? महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी होणार? पाहा….

Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. १ जूनला अखेरच्या टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र त्या अगोदरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
तर हरिणायामधील विधानसभा 3 नोव्हेंबर रोजी विसर्जित होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणूक एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. म्हणजेच राज्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नियमाप्रमाणे मुदत संपण्याआधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते. म्हणजेच सध्याच्या स्थितीमध्ये हरियाणात कितीही उशीरा निवडणूक घेतली तर विधानसभा 4 नोव्हेंबरआधी अस्तित्वात येणे गरजेचे आहे.
तर महाराष्ट्रामध्ये 27 नोव्हेंबर ही नव्या विधानसभेच्या स्थापनेची अंतिम मुदत असेल. 2009 सालापासून महाराष्ट्र आणि हरिणायातील विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात. प्रचार, उमेदवारी अर्ज, सभा या साऱ्याचा विचार करता सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत.
ही गोष्ट लक्षात घेतल्यास यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान असून हरियाणाबरोबर निवडणूक घ्यायची झाल्यास ती 29 ऑक्टोबर आधीच घ्यावी लागेल. 27 नोव्हेंबर या अंतिम तारखेचा आणि दिवाळीनंतरचा कालावधी बराच आहे.
तरीही हरियाणामधील नवीन विधानसभा 4 नोव्हेंबरपर्यंत स्थापन करणे आवश्यक असल्याने आणि दोन्ही राज्यांच्या निवडणुका केवळ 23 दिवसांच्या अंतरामधील काळात घेणं शक्य नसल्याने महाराष्ट्रातील निवडणूक दिवाळीच्या आधीच होण्याची शक्यता अधिक आहे.
यंदाच्या वर्षी 21 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरदरम्यान विधानसभेची निवडणुकीसाठी मतदान होऊ शकते असा दावा संबंधित बातमीत करण्यात आला आहे.





