Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; बारामतीत महिलेचा मृत्यू, जळगावात आंदोलकांवर मंडप कोसळला
राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे.

Maharashtra Unseasonal Rain : राज्यात मंगळवारी (२ जून) अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने धुमाकूळ घातला. काही ठिकाणी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तर अनेक भागांत मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, जळगावमध्ये आंदोलकांवर मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
बारामतीत भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
बारामती तालुक्यातील माळवाडी येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी दोन महिला एका पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयासाठी गेल्या होत्या. यावेळी शेडची भिंत अचानक कोसळल्याने दोघीही ढिगाऱ्याखाली अडकल्या. (Maharashtra Unseasonal Rain)
या दुर्घटनेत नंदा लडकत यांचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली आहे. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करून दोघींना बाहेर काढले. दरम्यान, शेडमध्ये असलेल्या १३ ते १५ शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra Unseasonal Rain)_
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे बारामती परिसरात शेती, पशुधन आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
करंजीच्या आठवडे बाजारात धावाधाव
करंजी येथे भरलेल्या आठवडे बाजारावर अचानक आलेल्या वादळी पावसाने कहर केला. भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात माल भिजून खराब झाला. (Maharashtra Unseasonal Rain)
वादळी वाऱ्यामुळे प्लास्टिक शेड, ताडपत्र्या आणि छत्र्या उडून गेल्याने बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना माल टाकून सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली.
नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा
नाशिक शहरात दुपारच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
जळगावमध्ये आंदोलकांवर मंडप कोसळला
जळगाव येथे उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना वादळी वाऱ्यामुळे उभारलेला मंडप आंदोलकांच्या अंगावर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याची माहिती आहे.
हवामान विभागाचा इशारा
राज्यात पुढील काही दिवस मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain)





