Maharashtra Politics : खरा तमाशा हा वर्षा आणि सागरवर सुरू; जागावाटपाच्या मुद्द्यावरून पटोलेंचा महायुतीला टोला

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज सुरुवात झाली आहे. पण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. ज्यामुळे कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून आज किंवा उद्या कोण किती जागा लढवणार याबाबतची माहिती समोर येऊ शकते, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
तर याचवेळी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आमच्यात कोणतीही बिघाडी नसून खरा तमाशा हा वर्षा आणि सागरवर सुरू असल्याचा टोला लगावला आहे. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाने समन्वयकाची जबाबदारी दिली आहे. ज्यामुळे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत करत आहेत. त्यामुळे पक्षाने नाना पटोले यांना बाजूला सारले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
मंगळवारी (ता. 22 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांनी नाना पटोले यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडीचे नेते लवकरच जागावाटप जाहीर करणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आणि काँग्रेस उमेदवारांच्या यादी याबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर मविआ नेत्यांची बैठक होणार असून 25 ते 30 जागांचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल. त्यामुळे आमच्यात कोणतीही नाराजी नाही. जागा वाटपामध्ये अडचणी येत असतात.
कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा दबाव असतो. नेत्यांना वाटतं की कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी जागा घ्यायला हवी. आमचा विषय आज उद्यामध्ये मिटणार आहे. आम्ही बाळासाहेब थोरात यांना काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्यांच्यासोबतही माझी बैठक होणार आहे, असेही नाना पटोलेंनी सांगितले.
यावेळी नाना पटोले यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. महायुतीच्या जागावाटपाबाबत नाना पटोले म्हणाले की, आमच्यापेक्षा जास्त गडबड महायुतीमध्ये आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांचा तमाशा दाखवला पाहिजे. सागर आणि वर्षा बंगल्यावर आता एकमेकांचे कपडे फाडायला लागले आहेत. त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत. आता खऱ्या अर्थाने खेळ सुरू होणार आहे. कारण भाजपाने खेळ सुरू केला होता पण आता कसा विखुरला जातो ते पाहा, असा इशाराच नाना पटोलेंनी दिला आहे.





