Maharashtra Politics : महायुतीला चांगल्या निर्णयांचे फलित मिळाले; छगन भुजबळ यांचे गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर

नाशिक : महायुतीमध्ये गुलाबराव पाटील आणि शिंदेसेन सोबत नसता, तर आमचे 100 आमदार निवडून आले असते. पण, शेवटी तिघांनी मिळून लाडकी बहीण, ओबीसी आणि शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले. यामुळेच विधानसभा निवडणूकीत महायुतीला चांगल्या निर्णयांचे फलित मिळाले. त्यात एक पक्ष असता, तर त्यालाही फायदा झाला असता. हा चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटलांना दिले.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधत होते. शिवसेनेतील आमदार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. अजितदादा महायुतीत नसते, तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते. छगन भुजबळ म्हणाले, शिंदे गट नसता, तर आमचेही 100 आमदार निवडून आले असते. मात्र, चांगल्या निर्णयांचे फलित महायुतीला मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते? हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्याने माहिती आहे. गुलाबरावांनी गुलाबरावसारख राहावे त्यांनी जुलाबराव होऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आहे, असा टोलाही लगाविला.





