Maharashtra Politics : 8 दिवसांत महाभूकंप? शिंदेच्या ‘या’ आमदाराचे ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य
राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या १५ दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या १५ दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे समोर आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच, आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांनी अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची संधी दिल्याने त्यांनी हा मोठा निर्णय घेतला.
या लागोपाठ लागलेल्या धक्क्यांनंतर आता राज्यात ‘ऑपरेशन टायगर ३’ राबवले (Maharashtra Politics) जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याने एक मोठी अपडेट दिली असून, येत्या आठ दिवसांत ठाकरे गटातील तब्बल १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यात ‘ऑपरेशन टायगर ३’ बाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. सत्ताधारी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी यावर सकारात्मक भाष्य केले असतानाच, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या मोहिमेबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट दिली आहे.
राजकारणात लोक येतात आणि जातात, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सतत ब्रेकिंग न्यूज मिळत राहील आणि येत्या ८ दिवसांत ‘ऑपरेशन टायगर ३’ प्रत्यक्ष पाहायला मिळेल, असे भोंडेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून आमदार फुटणार असल्याच्या या चर्चेवरून दोन्ही शिवसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि कलगीतुरा रंगला आहे. नुकतेच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही ‘ऑपरेशन टायगर ३’ बाबत सूचक भाष्य केले होते. हे ऑपरेशन कधी आणि कसे होईल हे कोणाला कळणारही नाही, तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच अनेक विद्यमान आमदार आणि माजी मंत्री प्रवेश करणार आहेत, असे मंत्री आबिटकर यांनी ठासून सांगितले होते.
त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री यांनी देखील यामध्ये भर घालत ‘ऑपरेशन ३.०’ सुरू झाले असून आता मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले होते. हा भूकंप कधी घडवून आणायचा याचा अंतिम निर्णय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. शिवसेनेच्या सर्वच बड्या नेत्यांनी आगामी काळात मोठा पक्षप्रवेश होण्याचे संकेत दिल्यामुळे या मोहिमेची चर्चा आता (Maharashtra Politics) गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगू लागली आहे.
दरम्यान, एकीकडे ‘ऑपरेशन टायगर ३’ च्या माध्यमातून आमदार फोडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहेत. आपला गड वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सायंकाळी ठीक सात वाजता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व आमदारांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
या बैठकीत ते उपस्थित आमदारांना सद्यस्थितीवर मार्गदर्शन करणार असून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कानमंत्र देणार असल्याचे समजते. आगामी काळातही विरोधी गोटाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना फुटीपासून रोखण्यासाठी नेमक्या काय सूचना देतात, याकडे आता संपूर्ण राजकीय विश्वाचे डोळे लागले आहेत.





