जयपूर – राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाला रामराम करून गेहलोत यांच्यासोबत गेलेले त्या पक्षाचे सहा आमदार नाराज आहेत. आम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते अद्याप पूर्ण झाले नसल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.
कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहापैकी केवळ राजेंद्र सिंह गुढा या एकमेव आमदाराला मंत्रिपद देण्यात आले. अन्य दोन जणांना राजकीय पद तर मिळाले मात्र कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. तर अन्य दोघांना काहीच मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत बोलताना गुढा म्हणाले की, गेहलोत यांनी कोणताच शब्द पाळला नाही.
2019 मध्ये आम्ही कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता, तेव्हा तीन जणांना मंत्री करण्यात आले होते तर तिघांना संसदीय सचिव बनवण्यात आले. जेव्हा आम्ही बसपाच्या विरोधात कृती केली तेव्हा रमेश मीणा बसपाचे आमदार होते. आज मीणा कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याच खात्यात मला राज्यमंत्री म्हणून काम करावे लागते आहे.
विशेष म्हणजे सचिन पायलट यांनी बंड केले होते तेव्हा मीणा त्यांच्या समवेत होते. तरीही त्यांचे कॅबिनेट कायम आहे. गेहलोत म्हणाले होते. मात्र त्यानुसार काही झालेले नाही. आम्ही कॉंग्रेसच्या संस्कृतीतील नाही. मात्र आम्हाला सगळ्यांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. आता आम्हाला सगळ्यांनाच असुरक्षित असल्यासारखे वाटते आहे.