Narendra Modi | Operation Sindoor – लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर या विषयावर चर्चेची मागणी करून विरोधकांनी चूक केली आहे का, असा प्रश्न त्यांना पडत असेल. भारतीय लष्करी सामर्थ्याचे सदस्यांनी जे विश्लेषण केले, त्यामुळे टीका करण्याजोगे विरोधकांना काही मिळाले नसावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संसदीय पक्षाने मंगळवारी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोदी यांचा सत्कार केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या जोरदार प्रतिसादाचे एनडीए बैठकीत खूप कौतुक झाले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी बैठकीला संबोधित केले. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी भारत माता की जय च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, ५ ऑगस्ट हा एक असा ऐतिहासिक दिवस होता, ज्या दिवशी जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. त्याबाबत एनडीए सरकारने संविधानाचे पूर्ण भावनेने पालन केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही कौतुक केले आणि ते या मंत्रालयात सर्वात जास्त काळ काम करणारे मंत्री बनले आहेत, असे म्हटले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव दरम्यान सशस्त्र दलांच्या अतुलनीय धैर्याचे आणि अटल वचनबद्धतेचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला. २८ जुलै रोजी श्रीनगरच्या बाहेर ऑपरेशन महादेव नावाच्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे तीन दहशतवादी मारले गेले. जून २०२४ मध्ये सरकार स्थापनेनंतर संसदेच्या अधिवेशनादरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या खासदारांनी अशी दुसरी बैठक घेतली. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर, ७ मे रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर जलद कारवाई केली. त्यानंतर, पाकिस्ताननेही भ्याड कृत्य केले आणि भारतातील नागरी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांवर हल्ला केला. १० मे रोजी, चार दिवसांच्या लढाईनंतर, पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली आणि युद्धबंदीची मागणी केली.