मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. तसेच कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्याचे प्रकारही घडत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना आठवडाभरातील घडामोडींबद्दल त्यांना अवगत केले, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर दोन्ही राज्यांतील तणाव कमी करण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मी फोनवरून चर्चा केली. कालच्या घटनेची संपूर्ण परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडली आहे. विनाकारण महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला होणे हे योग्य नाही, हे त्यांच्या मी लक्षात आणून दिले. याबाबत मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित देखील केले आहे. गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे ते म्हणाले.
दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या वाहनावंर हल्ला होणे हे एकदम चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी ते तात्काळ थांबवावे, अशी विनंती गृहमंत्र्यांना केल्यानंतर ते त्यामध्ये निश्चितच लक्ष देतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बसवराज बोम्मई यांना अमित शहा समज देणार का आणि या वादावर पडदा पडणार का, हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.