मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणार आहेत. शिंदे यांनी मंगळवारी नागपुरात याबाबत सांगितले आहे. मात्र, भेटीची तारीख त्यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही.
उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, काही धार्मिक नेत्यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘अयोध्या हे श्रद्धास्थान आहे. मी तिथे नक्कीच जाईन. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे भूमिपूजन केले. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला वाद सोडवून अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला होता.
दरम्यान, अयोध्या येथील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी सोमवारी (दि. 2 जानेवारी) मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात मुख्यमंत्री झाल्याप्रित्यर्थ प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येस यावे, अशी इच्छा महंतांनी यावेळी व्यक्त केली. या महंतांचे स्वागत करून त्यांच्या विनंतीला मान देऊन लवकरच अयोध्येला येऊ अशी ग्वाही यावेळी मुख्यमंंत्री शिंदे यांनी दिली.
#अयोध्या येथील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षातील सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केले. pic.twitter.com/5AlBF2BF6d
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 2, 2023
अयोध्येतील महंतांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते अयोध्येला जातील अशी शक्यता आहे मात्र, भेटीची तारीख मुख्यमंत्री शिंदे यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी होण्याआधी शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापासून रोखले होते. शिवसेनेतील बंडखोरीचे हे एक प्रमुख कारण ठरले. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान 22 जून 2022 रोजी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांना अयोध्येला जाण्यापासून रोखण्यात आल्याचे या आमदारांनी लिहिले होते. अयोध्येला निघालेल्या आमदारांना मुंबई विमानतळावरुनच परत यावं लागले होते