Maharashtra Assembly Election 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यातील प्रचाराची रंगत वाढणार आहे. ते आठवडाभराच्या कालावधीत ९ सभा घेणार आहेत. पुण्यात १२ नोव्हेंबरला होणारा रोड शो मोदींच्या प्रचार दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. भाजपच्या प्रदेश शाखेने गुरूवारी मोदींच्या प्रचाराचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, विधानसभा निवडणूक काळातील मोदींची पहिली सभा आजधुळ्यात होईल. त्यासाठी दुपारी १२ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ दुपारी २ वाजता नाशिकमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा असतांना बारामतीत सभा होईल का ? असा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’ बारामतीत मोदींची सभा होणार नाही या मागचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी होणारी लढत ही कुटूंबातील आहे. यामुळे अजित पवार यांना परिवारास महायुतीपेक्षा मोठे स्थान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेत आलेले बारामती मतदारसंघात पवार विरोध पवार अशी थेट लढत होणार आहे. यामध्ये शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार लढत आहे. बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बारामतीचे सहा वेळा प्रतिनिधित्व करत अजित पवार यांनी सातव्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकासाची गंगा त्यांनी बारामतीत आणली आहे. बारामती विकासाचा पॅटर्न म्हणून राज्यातच नव्हे देशात ओळखले जाते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अजित पवार यांचे पारडे जड राहिले आहे. यंदा मात्र पवार विरुद्ध पवार लढाई होत असल्याने वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण आहेत युगेंद्र पवार ? 33 वर्षांचे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ते व्यवसायिक आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली. युगेंद्र हे फलटणस्थित शरयू ऍग्रो इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शरयू साखर कारखाना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आपल्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना एकत्र आणून स्थापन केलेल्या महाराष्ट्र ऑरगॅनिक रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन च्या माध्यमातून सेंद्रिय आणि शाश्वत शेतीला चालना देण्याचे काम ते करतात. तसेच ते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे ते विश्वस्त आणि खजिनदार आहेत तसेच ते बारामती तालुका कुस्तिगीर परिषदेचेही प्रमुखही आहेत.