madhya pradesh election : मध्य प्रदेशातील 2500 उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद !

madhya pradesh election – मध्य प्रदेशातील विधानसभेच्या (madhya pradesh election) 230 जागांसाठी उद्या, शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात अडीच हजारांहून अधिक उमेदवार असून 5.60 कोटी मतदार आहेत. या मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असून सत्ता कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसचे भाजपला प्रमुख आव्हान आहे. यावेळी 2 हजार 533 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 2 हजार 280 पुरुष आणि 252 महिला आहेत. एक उमेदवार तृतीय पंथीय आहे. सर्व 230 जागांवर भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
तसेच बसपने 181, सप 71 आणि आम आदमी पार्टीने 66 उमेदवार उभे केले असून एकूण 1166 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. भिंडच्या अटेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार आहेत. तर सर्वात कमी 5 उमेदवार ब्योहारी आणि अनुपपूर विधानसभा मतदारसंघात आहेत.
राज्यात 5 कोटी 60 लाख 58 हजार 521 मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी आयोगाने 64 हजार 626 मतदान केंद्रे (103 सहाय्यक मतदान केंद्रांसह) तयार केली आहेत. त्यापैकी सुमारे 17 हजार मतदान केंद्रे संवेदनशील श्रेणीत असून येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. मतदान केंद्रांवर रात्रीच मतदानाची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉक पोल घेण्यात येणार असून, त्यात 50-50 मते टाकून पडताळणी घेण्यात येईल.
आचारसंहितेनुसार बुधवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची रणधुमाळी शांत झाली. आता मतदानापर्यंत रॅली, सभा, छोट्या सभा, रोड शो यावर पूर्ण बंदी असेल. त्याचबरोबर प्रचारासाठी तळ ठोकून बसलेल्यांना विधानसभा मतदारसंघ सोडावे लागणार आहेत. त्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. आता उमेदवार घरोघरी जाऊन आणि बंद खोल्यांमध्ये बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधू शकणार आहेत.





