निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी करा; राघव चढ्ढा यांची मागणी

नवी दिल्ली : देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी २५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे. ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी, अशी मागणी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी गुरूवारी केली. राज्यसभेत शून्य प्रहरावेळी चढ्ढा यांनी संबंधित मुद्दा उपस्थित केला. देशातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे इतके आहे.
भारत जगातील सर्वांत तरूण देशांपैकी एक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे. देशात पहिल्या लोकसभेत निवडून गेलेले २९ टक्के सदस्य ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मात्र, मागील लोकसभेतील केवळ १२ टक्के खासदार त्या वयोगटातील होते.
आपला तरूण देश ज्येष्ठ राजकारणी असलेला आहे. आपण तरूण राजकारण्यांचा तरूण देश बनण्याची आकांक्षा बाळगायला हवी. आपल्या देशात राजकारणाला बॅड प्रोफेशन मानले जाते. मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट बनावे असे पालकांना वाटते. मुलांनी राजकारणी बनावे असे कुणालाच वाटत नाही. राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.





