Lonavala: व्हीआयपीसाठी लोणावळ्यातील रस्ते मोकळे; सामान्य नागरिकांच्या त्रासाची प्रशासनाला कधी येणार दया?
Lonavala: उपराष्ट्रपतींच्या आगमनाची कुणकुण लागताच याच प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली

लोणावळा – उपराष्ट्रपतींच्या एका दिवसाच्या दौऱ्याने लोणावळ्यातील सर्व चित्रच बदलले बघायला मिळाले आहे. एरवी वर्षानुवर्षे वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेला हा प्रसिद्ध पर्यटन परिसर, केवळ ‘व्हीआयपी’ पाहुणचारासाठी काही तासांतच चकाचक करण्यात आला.
या झगमगाटामागची खरी दुसरी बाजू म्हणजे, सामान्य नागरिकांच्या नशिबी असलेला रोजचा त्रास! “हा व्हीआयपी पाहुणचार केवळ विशेष व्यक्तींसाठीच का? सर्वसामान्य करदात्यांसाठी ही तत्परता कधी दाखवणार?” असा संतप्त सवाल आता संतप्त लोणावळेकर प्रशासनाला विचारत आहे.
शहरातील मुख्य रस्ते, महामार्गालगतच्या बेकायदेशीर टपऱ्या आणि बेशिस्त वाहतूक यामुळे स्थानक, शाळा आणि बाजारात ये-जा करणाऱ्या नागरिकांचे जीवन नकोसे झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही आयआरबी, एमएसआरडीसी आणि स्थानिक प्रशासन केवळ डोळेझाक करत होते. मात्र, उपराष्ट्रपतींच्या आगमनाची कुणकुण लागताच याच प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली.
रातोरात रस्ते चकाचक झाले, काळकटलेले, मळकटलेले रस्ते दुभाजक धुतले गेले, महामार्गालगतच्या पेरू विक्रेत्यांसह इतर अतिक्रमणे हटली आणि वाहतूक सुरळीत झाली. केवळ एका दिवसाच्या व्हीआयपी शोभेसाठी आणि दिखाव्यासाठी यंत्रणा राबवणाऱ्या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आता “आमच्या भागात रोजच एखादी व्हीआयपी मूव्हमेंट ठेवावी लागेल का?” अशी उपरोधिक व संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
प्रशासनाने आता तात्पुरता दिखावा बंद करून शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी तातडीने आणि कायमस्वरूपी कठोर पावले उचललीच पाहिजेत, अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे.
Pimpri-Chinchwad: डीजेचा दणदणाट की धोक्याची घंटा? हृदयविकार, कानांचे विकार आणि अस्वस्थतेचा धोका





