Lonavala : लोणावळा येथील पूरग्रस्तांचा टाटा कार्यालयावर ठिय्या आंदोलन
Lonavala : आठ दिवसांत कंपनीकडून मदतीचे लेखी आश्वासन

लोणावळा – ६ जुलै महिन्यातील रोजी आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या सुमारे दोन हजार पूरग्रस्त कुटुंबांना अद्यापही मदत न मिळाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला.
पूरस्थितीला टाटा कंपनीचे मान्सून लेक कारणीभूत असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिक, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी गुरुवारी (दि. २०) कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
मान्सून लेकमधून मोठ्या प्रमाणात पाणी शहरात आल्याने लोणावळ्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरात सुमारे दोन हजार कुटुंबांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत कंपनी प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही प्रत्यक्ष मदत मिळाली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागरिकांसह कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला होता. आंदोलक कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.
नगरपरिषदेने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. मात्र अद्यापही शासकीय मदतही बाधित कुटुंबांपर्यंत पोहोचलेली नसल्याची तक्रार आहे. काही सामाजिक संस्थांनी केलेल्या मदतीच्या आधारावरच नागरिकांना दिवस काढावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
आठ दिवसांत मदतीचे आश्वासन
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन टाटा कंपनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत नगरपरिषदेला लेखी पत्र दिले. झालेल्या नुकसानीबद्दल खेद व्यक्त करत सीएसआर निधीतून मंजुरी घेऊन पुढील आठ दिवसांत पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे आश्वासन कंपनीने दिले.
या लेखी आश्वासनानंतर लोकप्रतिनिधींनी आंदोलन तूर्तास स्थगित केले. मात्र आठ दिवसांत मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.





