Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागावाटपावरून खटके उडत असल्याचे दिसत होते. काही जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र याबाबत महाविकास आघाडीतर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर केले.
आज जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपामध्ये भिवंडी, सांगली या विवादित जागांचा तिढा सोडवण्यात तिन्ही पक्षांना यश आले असून शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत अशी माहिती सामोर येत आहे की, ;त्या कुणाचेच फोन घेत नव्हत्या. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती’. या चर्चांवर आता वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी पक्षाने आपणास विश्वासात घेतले नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.
नेमकं काय म्हणाल्या वर्षा गायकवाड
‘मुंबईत जागा वाटपावर आम्ही नाराज आहोत. यामुळे पक्षश्रेष्ठींकडे माझे म्हणणे मी मांडले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आमचे संघटन आहे. यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे, ही अपेक्षा होती. मुंबईतील कोणत्या जागा हव्या होत्या, ते पक्षातील श्रेष्ठींना सांगितले होते. जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे, ही अपेक्षा होती.’
हे वाचले का ? अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दावा