श्रीगोंदा – खेळताना घरासमोरील शेततळ्यात पडून आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8) या दोन चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात आज दुपारी घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बंडोपंत साळुंखे हे लोणी व्यंकनाथ शिवारातील खामकरवाडी येथे राहतात. बंडोपंत साळुंखे व त्यांच्या पत्नी हे दोघेही नेहमीप्रमाणे शेतात गेलेले होते. तर आज रविवारची शाळेला सुट्टी असल्याने त्यांची दोन्ही मुले घरीच होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेततळ्याजवळ खेळताना अनिकेत पाण्यात पडला, हे पाहून आर्यनने त्याला हात देण्याचा प्रयत्न केला.
परंतु, पाय घसरल्याने आर्यनही पाण्यात पडला. मुले शेततळ्याजवळ खेळत असल्याचे शेजारच्या एका महिलेने पाहिले होते. परंतु, मुले न दिसल्याने शंका येताच त्या महिलेने आरडाओरडा केली. परिसरातील युवकांनी त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.
आई-वडीलांनी आपल्या चिमुकल्या मुलांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. आई-वडीलांच्या डोळ्यातील वेदनादायी अश्रू पाहून उपस्थितांनाही अश्रू लपविता आले नाहीत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आर्यन आणि अनिकेत साळुंखे या दोघा चिमुकल्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने लोणीव्यंकनाथ गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
आठवड्यापूर्वीच केले शेततळे
उन्हाळ्यात शेतीला पाण्याची कमतरता भासू नये, या उद्देशाने बंडोपंत साळुंखे यांनी नुकतेच घरासमोर छोटे शेततळे केले होते. आठवडाभरापूर्वीच या शेततळ्याचे काम पूर्ण झाले असून दोन-तीन दिवसांपूर्वीच या शेततळ्यात पाणी सोडण्यात आल्याची माहिती समजली.