samyukt kisan morcha : संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रपती मुर्मूंना पत्र; चर्चेसाठी भेटीची व्यक्त केली इच्छा !

samyukt kisan morcha – संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रातून शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ देण्याचे साकडे घालण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी १० महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करत आहेत.
त्या सीमेवरील खनौरी या ठिकाणी महिनाभरापासून शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ७० वर्षीय डल्लेवाल यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एसकेएमने राष्ट्रपतींकडे भेटीची इच्छा व्यक्त केली आहे.
देशभरातील शेतकऱ्यांमधील अस्वस्थता वाढीस लागल्याकडे एसकेएमने पत्रातून लक्ष वेधले आहे. देशातील ५०० जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींपर्यंत पोहचवण्याचे निवेदन याआधीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा घडवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्या निवेदनातून करण्यात आली आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी, अशी आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.





