Kapil Dev Statement : “रोहित आता २० वर्षांचा तरुण नाही, तो…” हिटमॅनच्या वादात कपिल देव यांची एन्ट्री; म्हणाले, ‘कोणाचेही स्थान पक्के…’
Kapil Dev Statement : कपिल देव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारतीय संघात विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे स्थानही कधी 'कायमस्वरूपी' किंवा 'पक्के' असू शकत नाही.

Kapil Dev Statement On Rohit Sharma Virat Kohli ODI Retirement : भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्माच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशा अत्यंत संवेदनशील वातावरणात आता भारताचे माजी दिग्गज कर्णधार आणि १९८३ चे विश्वचषक विजेते कपिल देव यांनी उडी घेतली आहे. कपिल देव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारतीय संघात विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे स्थानही कधी ‘कायमस्वरूपी’ किंवा ‘पक्के’ असू शकत नाही. मात्र, जोपर्यंत हे अनुभवी फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, तोपर्यंत त्यांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.
कपिल देव यांनी दिला सचिन तेंडुलकरचा दाखला –
‘पीटीआय’शी बोलताना कपिल देव यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “क्रिकेटमध्ये कोणाचेही स्थान कायम नसते. जो चांगला खेळेल तोच संघात राहील. सचिन तेंडुलकरने जेव्हा निवृत्ती घेतली, तेव्हाही त्याच्यात बरेच क्रिकेट बाकी होते. खेळाडूंना संघात ठेवायचे की बाहेर काढायचे, हा सर्वस्वी अधिकार निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा आहे. मी टीव्हीवर मॅच बघून फक्त माझी वैयक्तिक मत देऊ शकतो. निवडकर्ते देशासाठी सर्वोत्तम संघ निवडतील, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.”
रोहित आता २० वर्षांचा तरुण नाही – कपिल देव
“Certainty never applies to anybody, whoever keeps performing, keeps playing.
(Rohit) is not 20 years old.
He is almost touching 40, and everybody has to retire, but the amount of happiness he has given to everybody—not just Indian people.
What he has given us for so many… pic.twitter.com/RRleDeBQaT
— News Arena India (@NewsArenaIndia) July 19, 2026
रोहित शर्माच्या वयाचा उल्लेख करत कपिल देव म्हणाले, “रोहित आता २० वर्षांचा तरुण नाही, तो जवळपास ४० वर्षांचा (३९ वर्षे) होत आला आहे आणि प्रत्येक खेळाडूला एक ना एक दिवस निवृत्ती घ्यावीच लागते. मात्र, त्याने भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना जो आनंद दिला आहे, त्यासाठी त्याला सलाम केला पाहिजे. जोपर्यंत तो खेळू शकतो किंवा जोपर्यंत कर्णधार व सिलेक्टर्सना त्याची गरज वाटते, तोपर्यंत त्याला संधी दिली गेली पाहिजे. संघ जर सध्या बदलाच्या टप्प्यातून जात असेल, तर त्यात काहीही गैर नाही.”
टी-२० मालिकेतील पराभवावर व्यक्त केली चिंता –
भारताला नुकतेच आयर्लंडविरुद्ध ०-२ आणि इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत ०-४ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावर चिंता व्यक्त करताना कपिल देव म्हणाले, “गेल्या ३-४ वर्षांतील भारताची कामगिरी पाहता, मला अशा खराब कामगिरीची अजिबात अपेक्षा नव्हती. पण खेळात असे चढ-उतार येत असतात. खेळाडूचे वय किंवा त्याचा आंतरराष्ट्रीय उंची न पाहता, केवळ भारताला मॅच जिंकवून देण्याची क्षमता असणारीच टीम निवडली जावी.”





