डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली पवार यांची भेट; शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा
Updated On:

नवी दिल्ली – डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यात शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाली. पवार यांच्या निवासस्थानी जाऊन माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भाकपचे सरचिटणीस डी.राजा यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
शेतकरी आंदोलनाच्या अयोग्य हाताळणीवरून सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला खडसावल्याच्या दिवशीच झालेल्या त्या भेटीचे महत्व वाढले आहे. भेटीनंतर डाव्या पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांशी फार काही बोलण्याचे टाळले.
न्यायालयातील सुनावणीविषय आमच्यात चर्चा झाली. पुढील रणनीतीचा निर्णय शेतकऱ्यांनाच घ्यायचा आहे. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांची पुढील भूमिका निश्चित झाल्यानंतरच काही बोलणे उचित ठरेल, असे राजा यांनी म्हटले.





