Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला; म्हणाले, ‘तुमचा भाबडेपणा हा महाराष्ट्रातील जनतेला …’

शिर्डी – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला होता.
“तुम्ही जेव्हा लोकसभेत जिंकता तेव्हा तुम्हाला जनतेने जिंकवले. जेव्हा तुम्ही विधानसभेत हरता तेव्हा तुमची हार ही ईव्हीएममुळे झाली, अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकला आहे. ईव्हीएमबाबत मतदान कसं झाले? उशिरा का झाले? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे.
शिर्डी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, “जसा आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला. मी तेव्हा ईव्हीएम वगैरे बोललो नाही. त्या पराभवानंतर पुन्हा जनसेवा केली आणि जनसेवेनंतर विधानसभेला जनतेने अभूतपूर्व यश महायुतीला दिले. जनतेने आम्हाला दिलेले यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे”, असा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला.
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल, अनकॅप्ड खेळाडूची अचानक एंट्री…
धनंजय मुंडे म्हणाले, “काँग्रेसचे नेते जे म्हणतात किंवा आरोप करतात, त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी एकदा बघावे. ते कुठून कुठपर्यंत आले आहेत. त्यांनी जी काही आहे तेवढी पण ठेवली नाही, जेवढी लाज राहिली आहे तेवढी तरी त्यांनी राखावी. ते 2029 च सांगत आहेत, आज तुम्हाला महाराष्ट्रातील मायबाप जनतेने जो धडा शिकवला, त्याबाबतीत बोला ना, असे म्हणत मुंडे यांनी काँग्रेस नेत्यांना खुले आव्हान दिले.




