“…तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल” ; धनंजय मुंडेंसाठी आता लक्ष्मण हाके मैदानात

Laxman Hake on Dhananjay Munde । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होते आहेत. त्यातच काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान, आता या सगळ्यात धनंजय मुंडेंना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आता ओबीसी नेत्यांकडून देण्यात आला आहे.
ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा Laxman Hake on Dhananjay Munde ।
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांवर ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात बोलताना,”आमच्या ओबीसी समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. त्या नेत्याच्या संरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरेल, ” असा इशारा देत लक्ष्मण हाके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. लक्ष्मण हाके काल जालन्यात बोलत होते त्यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांना लक्ष्य केले.
पुढे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्याविषयी बोलताना,” अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली दलालिया ठेवावे. निवडक नेत्यांची प्रकरणं उकरुन काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायेच, हा अंजली दमानिया यांचा एककलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात अंजली दमानिया यांनी जेवढी प्रकरण उपस्थित केली, त्या प्रकरणांचे पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहिती आहे. दमानिया या मीडियात फक्त स्पेस शोधण्याचा काम करतात, त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये,” असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारणासाठी भांडवल केले जात आहे. तपासासाठी राज्य शासन गृह विभाग आहे, न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेवरती आमचा प्रचंड विश्वास आहे. व्यवस्था यांना मान्य नसेल तर ही एसआयटी,सीआयडी, न्यायालयं बरखास्त करून या जरांगे सारख्या खुळचट माणसाला त्यावर नेमावे. तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे? स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट आहे?, “असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
धनंजय देशमुखांनी जरांगेंच्या नादी लागू नये Laxman Hake on Dhananjay Munde ।
धनंजय देशमुख यांची पहिल्या दिवसापासून अतिशय समतोल भूमिका आहे. धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेच्या नादाला लागू नये. जरांगे दोन वर्षापासून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. धनंजय देशमुख यांच्या भूमिकेचा मी पहिल्या दिवशीपासून स्वागत केले आहे. जरांगेंच्या नादी धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवाने या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते, अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगेंच्या पुढे कायम चॅनलचे बूम असतात, मिडियाचे बूम नाही बघितले तर मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम होईल. जरांगे काय बोलतो याकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही, ओबीसीच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री कसे लक्ष देतील यासाठी आम्हाला लढायचं आहे, आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करायचे आहे, “असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
ओबीसी नेत्यांना निर्णयप्रक्रियेतून दूर करण्याचे षडयंत्र
यावेळी लक्ष्मण हाके यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या भूमिकेचे समर्थन केले. एखाद्या नेतृत्वाला बदनाम केलं जात असेल त्याचा राजीनामा घेण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था काम करत असेल, तर ते व्यक्त झाले यापलीकडे काय? आज भुजबळ साहेब नसल्या कारणामुळे कॅबिनेटमध्ये काय गोष्टी होतात? ओबीसी आरक्षणावरती बोलणार कोण ठामपणे? त्यामुळे भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत, असे मत लक्ष्मण हाके यांनी मांडले.
निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणसं बाजूला करण्याचं षडयंत्र रचले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आणि टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र आहे. रोहित पवार यांचा आयटी सेल सोशल मीडिया वरती ओबीसी नेत्यांना टार्गेट करून बदनामी करण्याचं काम करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.





